मुंबई – ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘भाजपसोबत जाऊ या… नाहीतर मला अटक होईल… असे म्हणत ते मातोश्रीवर येऊन रडले होते’, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी हा दावा केला आहे. सध्या त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, अनेक नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आता यावर युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही त्यांच्या अनोख्या शैलीत ठाकरेंचा समाचार घेतला आहे. “एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले…’ अशी चारोळी आठवलेंनी म्हणत या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी सवांद साधत होते.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “आदित्य ठाकरे, म्हणतात, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणे अत्यंत चुकीचा आहे’. असं ते म्हणाले.
नेमकं आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? वाचा…..
आदित्य ठाकरे म्हणाले की… ‘शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे ते म्हणाले होते.’ असं ते म्हणाले.