सातारा – महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत. आपल्याकडे सुध्दा तसे कडक कायदे करण्याची गरज आहे. चोरी करणाऱ्यांची बोटे छाटली जातील. बलात्कार करणाऱ्यांनाही तशीच शिक्षा हवी, अशी आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. एका बाजूला स्त्रीला आपण आदिशक्ती म्हणतो, तिचा स्वाभिमान जपण्याचं काम आपण केलं पाहिजे, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी उदयनराजे यांनी संगम माहुली येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “”स्त्रिया व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा शिल्लक राहिला आहे का, बलात्काराचा गुन्हा करणारे धनदांडगे पैशाच्या जोरावर पोलिसांना खरेदी करतात. त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे.
बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत. आपल्याकडेसुध्दा तसेच कडक कायदे करायला हवेत. चोरी करणाऱ्यांची बोटे छाटली जातील. भीतीच राहिली नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीबाबतचा मुद्दा मी लावून धरला नसता तर तो केव्हाच बाजूला पडला असता. उशिरा का होईना आता लोक एकत्र येतायत ही चांगली गोष्ट आहे.”
सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी
सीमा प्रश्नावर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले, “”भाषावार प्रांत रचना होणे अपेक्षित होते. पण ती झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमले नाही. त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती. केंद्रात पंतप्रधानांनी दोन्ही राज्यांतील प्रमुख पक्षांना निमंत्रित करावे आणि सांगावे. तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. या प्रश्नाबाबत पंतप्रधानांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे.” यावेळी श्रीमंत कोकाटे, चंद्रकांत पाटील व इतर उपस्थित होते.