पुणे – थकबाकी न भरल्याने पालिकेच्या कार्यालयांचा वीज पुरवठा महावितरणकडून तोडला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला पालिकेच्या विद्युत विभागाने कोथरूडमधील उद्यानात 88 लाख रुपये खर्च करून बोलणारी झाडे बसवण्याचा घाट घातला आहे. त्या अंतर्गत 3 झाडे बसवण्यात येणार असून त्यासाठीच्या निविदाही काढल्या आहेत. करोनामुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे विकास प्रकल्पांसाठी महापालिका 200 कोटींचे कर्ज काढत असताना, ही उधळपट्टी कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक 7 हजार 300 कोटीचे असले, तरी प्रत्यक्षात केवळ 4 हजार 500 कोटी रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळणार आहे. तर, महापालिकेने काढलेल्या निविदा आणि मार्चअखेरीस येणारी बिले पाहता 5,200 कोटींचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे विकासकामे थांबवत आवश्यक बाबींसाठीच खर्च करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.
त्यानुसार डिसेंबरअखेर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली. मात्र, आता उधळपट्टी सुरू झाली आहे. ज्या विद्युत विभागाकडे महापालिके आस्थापनांची वीज बिल भरण्याची जबाबदारी आहे, त्या विभागाचाच निधी संपल्याने त्यांना इतर प्रकल्पांचा निधी वर्गीकरणाद्वारे दिला जात आहे. अशा स्थितीत बोलक्या झाडांसारख्या अनावश्यक कामांवर निधी उधळला जात आहे.
अशी असतील झाडे
या निविदेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभाग 12 क मधील बाळासाहेब ठाकरे उद्यानात 88 लाख रुपये खर्च करून ही 3 झाडे बसवण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक डिवाइस असलेली झाडे असून लहान मुले-नागरिक झाडाजवळ गेल्यानंतर ही झाडे त्यांच्याशी संवाद साधतील. त्यांना पर्यावरण तसेच वृक्ष संर्वधनाची माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात देतील, अशी संकल्पना घेऊन ही झाडे बसवण्यात येत आहेत. करोनामुळे गेल्या वर्षभरापासून उद्याने लहान मुलांसाठी बंद आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही केवळ चालण्यासाठी उद्याने सुरू असताना हा खर्च करण्याची घाई का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.