रस्त्यावरील मुलांसाठी संवादी शिक्षणाचा “अभिजित’ ज्ञानयज्ञ
– शिवानी पांढरे
पुणे – रस्त्यावर काही बाही विकून काही तरी कमावल्याशिवाय पोटाची खळगी भरत नाही… मग… शिक्षणाचं काय घेऊन बसलात… आयुष्यभर खावे लागणारे टक्के टोणपे हीच त्यांची शाळा आणि आलेले अनुभव हेच त्यांचे विद्यापीठ… पण याही मुलांना शिकवावं… त्यांना आयुष्याच्या नव्या वाटा दाखवाव्यात म्हणून एका तरुणाने या शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठी पदपथांवरील चालत्या बोलत्या आणि संवादी शाळा सुरू केल्यात.
आपल्या घरातील बच्चे कंपनी करोनामुळे सध्या शाळेऐवजी घरातच “ऑनलाइन’ शिकत आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या कोपऱ्यावरही एक अनोखी शाळा भरत आहे. अन् दादाच्या या शाळेत आनंदाचे गाणे विद्यार्थी गात आहेत. रस्त्यावरील लहानग्यांनाही शिक्षण मिळावे, त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उदात्त हेतूने हा अटोकाट प्रयत्न करणाऱ्या तरुणांचे नाव आहे, अभिजित पोखर्णीकर आणि अल्फेन्सा कसबेकर. हे रस्त्यावरील भारताच्या भविष्याला विनामूल्य शिक्षण देत आहेत. आपल्या शिक्षणाचा फायदा उद्याच्या पिढीला व्हावा, एवढाच या दोघांचा हेतू.
वयाच्या विशीतील अभिजित मूळचा पुण्याचाच. अभिनव महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणारा. लहानपणापासूनच धडपड्या आणि प्रयोगक्षम. या वृत्तीनेच त्याला बालपण हरवलेल्या चिमुरड्यांचा दादा बनवले. अभिजितची या कल्पनेला साथी हात बढाना म्हणत अनेकांनी मदतीचे हात दिले. आज कष्टकरी बाल्य अनुभवणारे 60 हून अधिक विद्यार्थी या शिक्षण यज्ञात सहभागी झाले. ती 60 मुलं आणि त्या प्रत्येकासाठी एक स्वयंसेवक असं गणीतही जुळलंय. मार्केट यार्ड, सारसबाग आणि झेड ब्रिजखाली नदीपात्रात अशा तीन ठिकाणी हा ज्ञानयज्ञ चालतो.
रूढीबद्ध शिक्षण न देता त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलावं याकडे येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. पुण्यात रस्त्यावर राहणारी एकूण 12 हजार 427 मुले आहेत. त्यांचे पालक रस्त्यांवर वेगवेगळ्या वस्तू विकतात. अनेक वेगवेगळे पारंपरिक व्यवसाय करतात. मुलंही तेच काम करतात. पुण्यातील ही मुले शिक्षणवंचित आहेत.
दादाची शाळा हा त्यांच्या भविष्याचा उत्तम पर्याय आहे. आम्ही मार्केट यार्ड परिसरात फुलांचा व्यवसाय करतो. माझ्या मुलीला लहान दोन मुलं आहे. तिच्यासारखीच परिस्थिती माझ्या नातवंडावर येऊ नये म्हणून मला माझ्या नातवंडांना शिकवायचं आहे. मात्र शाळेचा खर्च परवडणारा नाही त्यामुळे त्याचे शिक्षण रखडले. मात्र आता दादाच्या शाळेत ही मुलं जायला लागली आहे. म आता मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे यांचं भविष्य कदाचित उज्वल होईल, असे या शाळेत शिकणाऱ्या एका चिमुड्याच्या अजोबांनी सांगितले.
तर अभिजीत म्हणाले, मुलांना गोळा करणं किंवा त्याच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं खूप अवघड जातं. आम्ही भीक मागत वाढलो आमच्या मुलाचेही तेच नशीब, ही पालकांची प्रबळ धारणा बदलण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. घसा कोरडा होतो समजावताना. या धारणेतूनच अनेकदा मुलाची इच्छा असूनही पालक सोडत नाहीत. व्यसने किंवा चोरीच्या मार्गाला लागतात. त्यांच्यात मिसळल्यावर जाणवले त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे, असा अनुभवही अभिजित सांगतो.
माझ्यासारखीच अनेक मुलं शिक्षित व्हावी म्हणून मी दादाची शाळा सुरू केली. या दादाच्या शाळेत बरेच स्वयंसेवक आहेत ते विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्त्रोत नसलेल्या रस्त्यावरील मुलांसाठी काम करतात. मी स्वतः लहानपाणी रस्त्यावरच्या शाळेत शिकलो आहे काही ओळखीचे शिक्षक मला शिकवत असत, कॉलेजचा अभ्यास करताना संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात सहभागी झालो. त्याच्या परिषदांमधून शिक्षणाचे देशाच्या दृष्टीने महत्त्व लक्षात आले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या काही शाश्वत विकासाचे ध्येयाचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच माझं ध्येय गवसलं.. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊया; एक प्रगत देश घडवूया
-अभिजीत आनंद पोखर्णीकर