नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम ( P Chidambaram ) यांनी आज १४ खासदारांच्या निलंबनावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, सुरक्षेचा भंग करणार्यांना हे सरकार प्रतिबंधित करू शकत नाही पण विरोधकांना शांत करण्यासाठी ते त्यांचे निलंबन मात्र करीत आहेत. ( Congress vs bjp )
तृणमूल काँग्रेसचे ( TMC ) डेरेक ओब्रायन यांना गुरुवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले, तर काँग्रेसच्या नऊ आणि द्रमुकच्या कनिमोझी यांच्यासह १४ विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले.त्यावर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. देशातील हुकुमशाहीच्या विरोधात तसेच वाढत्या बेरोजगारीच्या संबंधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १३ डिसेंबर रोजी एकूण चार जणांनी संसदेची सुरक्षा भेदून तेथे निदर्शने केली. त्यावरून सध्या संसदेत मोठेच वादंग सुरू आहे.
विरोधकांनी या प्रकरणी सरकारला विशेषत गृहमंत्री अमित शहा यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळही सुरू आहे. पण विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या खासदारांनाच निलंबीत करण्याचे सत्र सरकारने अवलंबले आहे त्यावरून चिदंबरम यांनी हा निशाणा साधला आहे.
एका पोस्टमध्ये चिदंबरम म्हणाले, भाजपचे राजकारण सध्या अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे. या घटनेच्या संबंधात पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन करावे अशी मागणी विरोधी पक्षाचे खासदार करीत असतील तर तुम्ही त्यांच्यावर थेट निलंबनाचे अस्त्र उगारता. हे खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. काँग्रेसने गुरुवारी विरोधी खासदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असे वर्णन केले आणि भाजप सरकारने संसदेला रबर स्टॅम्प बनवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.