नगर -मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न होत आहेत. आर्थिकदृष्ट्या अनेकांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे सरकारने खासगी शाळांतून काही जागांवर मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली. प्रवेश मोफत आहेत म्हटल्यानंतर सर्व प्रवेश होतील, असे अपेक्षित होते. मात्र, यावर्षीही सरकारचा अंदाज चुकला आहे. राज्यभरात अजूनही तब्बल 29 हजार 134 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील 1032 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रवेश प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ देऊनही सर्व जागांवर प्रवेश देण्यात यश आले नाही.
यंदा जिल्ह्यातील 400 शाळा पात्र ठरल्या होत्या. या शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के म्हणजे 3058 जागांवर मोफत प्रवेश देण्याचे नियोजन होते. यासाठी पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी आधी 20 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीत निम्मे सुद्धा प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवले गेले. मात्र या वाढीव मुदतीतही काही जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा 10 मे पर्यंत मुदत दिली होती. आज ही मुदतही संपली आहे.
या मुदतीत नगर जिल्ह्यातील 1 हजार 892 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 1 हजार 32 जागा अजूनही रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेस पुन्हा मुदतवाढ मिळेल का, याबाबत अद्याप आधिकृत काहीच नाही. जर यावेळी मुदतवाढ मिळाली नाही तर या रिक्त जागांसाठी प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात तब्बल 29 हजार जागा रिक्त
राज्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. राज्यात एकूण 9086 शाळा पात्र ठरल्या होत्या. या शाळांतील 1,01,906 जागांवर प्रवेश देण्याचे नियोजन होते. यासाठी 2,82,783 अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यात 90 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्षात 10 मे पर्यंत फक्त 61 हजार 551 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजेच, जवळपास 29 हजार 134 जागा रिक्त
राहिल्या आहेत.