पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसह आता ग्रामीण भागातील प्रवासीही “पीएमपी’ला पसंती देत आहेत. संपानंतर एसटी पूर्ववत झाली आहे. तरीही, “पीएमपी’ बसची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागांतील आणखी काही मार्गांवर बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील 370 मार्गांवर 1500 पेक्षा अधिक बसेस धावतात. पुढच्या टप्प्यात पीएमपी प्रशासनाने शहरांलगतच्या ग्रामीण भागांत मोजक्याच मार्गावर बससेवा सुरू केली. त्यानंतर एसटी कर्मचारी संपामुळे अप-डाऊन करणाऱ्यांची अडचण लक्षात घेता पीएमपीने 24 मार्गांवर सेवा सुरू केली. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक उत्पन्न वाढले असून, नागरिकांना जलद प्रवास करण्यास मदत झाली. एसटी सुरू होऊनही ग्रामीण भागातील नागरिक नवीन मार्गांची मागणी करत आहेत.
एसटी संप काळात ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने काही मार्गांवर सेवा दिली. पीएमपीची स्थापना मुळातच शहरांतील सार्वजनिक वाहतुकीसाठी झाली आहे. आम्ही आगामी काळात शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
एसटीने दिले होते पत्र
कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर एसटी सुरू झाली. पण, तोपर्यंत पीएमपी बसेसदेखील सुरू होत्या. संप मिटताच पीएमपीने ग्रामीण भागातील सेवा बंद करावी, अशा आशयाचे पत्र एसटी महामंडळाने दिले होते. पण, प्रवासी मात्र पीएमपीलाच पसंती देत आहेत.
ग्रामीण भागात ठराविक वेळेने एसटी बस येते. त्यामुळे प्रवासासाठी एसटीशिवाय दुसरा पर्याय इतके दिवस नव्हता. पण, पीएमपी बस प्रत्येक अर्धा ते एक तासांनी येते. त्यामुळे आमचा प्रवास जलद होतो.
– राजेश पवार, तळेगाव दाभाडे
दरम्यान, प्रवाशांची मागणी असली तरी बस सुरू करताना पीएमपी प्रशासन कात्रीत सापडले आहे. कारण, असलेल्या बसेस बंद करण्याबाबत एसटीने पत्र दिले आहे.