पुणे- तीन वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे 2019 च्या जाहिरातीच्याच अनुषंगाने भरली जाणार आहेत. यासाठी तत्काळ भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचा शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्घ झाला.
ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांचीच परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाही किंवा नव्याने जाहिरात देण्यात येणार नाही, असे शासनाने म्हटले आहे. ग्रामविकास विभागांतर्गत वर्ग-3 च्या 18 संवर्गातील सरळसेवेच्या 13,514 पदभरतीची कार्यवाही शासनाच्या “महाआयटी’ कंपनीमार्फत भरण्यात येणार होती. त्यानुसार जाहिरात प्रकाशित झाली होती. यासाठी एकूण 11 लाख 28 हजार 133 ऑनलाईन अर्ज महाआयटीकडे नोंदणी झाले होते. मार्च 2019 नंतर त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांत नाराजी होती. या संदर्भात आंदोलनदेखील करण्यात आले होते. पण, करोना विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले होते.
उर्वरित पदभरती कधी?
आता शासनाने केवळ जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्गातील पदे भरण्यास मान्यता दिल्याने नाराजी आहे. इतरही 13 संवंर्गातील पदांची भरती मार्च 2019 च्या जाहिराचीच्या अनुषंगाने करावी. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांची परीक्षा घेण्यात यावी. यासाठी नव्याने अर्ज मागवू नयेत किंवा नव्याने जाहिरात देऊ नये, अशी मागणी उमेदवार करत आहेत.
शासनाने केवळ प्रसिद्धी पत्रक जाहीर न करता परीक्षा लवकरात लवकर जाहीर कराव्यात. तीन वर्षांपासून उमेदवार परीक्षांचा अभ्यास करत आहेत. अजून किती दिवस वाट पाहायची? जिल्हा परिषदेतील केवळ आरोग्य विभागाशी संबंधित जागांची परीक्षा न घेता इतरही पदांसाठी प्रक्रिया सुरू करावी. – उद्धव उगले, स्पर्धा परीक्षा उमेदवार