मुंबई -“मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाहीये. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे. भारतमातेच्या हातापायांत बेड्या पडताना मी पाहू शकत नाही” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह सत्ताधारी भाजपवर केली. ठाण्यात हिंदी भाषक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
२०२४ ची आपली संधी हुकली तर हा संपूर्ण देश नालायक आणि हुकूमशहांच्या हातात जाईल असा घणाघात यावेळी ठाकरेंनी भाजपविरोधात केला. इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवून राज्य केलं त्यानंतर आपण स्वतंत्र झालो असा दाखल देत ठाकरे म्हणाले,”आता आपल्या घरातलेच आपल्या डोक्यावर बसू पाहत आहेत. पण कुणीही असलं तरी गुलामी ही गुलामीच असते. त्यामुळे मी माझ्या भारतमातेला पुन्हा गुलाम बनू देऊ इच्छित नाहीये,”
“तुम्ही गुलाम बनून विकासाचं स्वप्न पाहू शकता का? ते उठ म्हटले तर उठावं लागेल, ते बस म्हटले तर बसावं लागेल. हा विकास तुम्हाला मंजूर आहे का?” अशी खोचक टीका देखील ठाकरेंनी यावेळी नाव न घेता पंतप्रधानांवर केली. आज आपला देश अशा वळणावर आला आहे. २०२४ ची संधी हुकली तर रेल्वे सुटली असंच बोलावं लागेल असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
“मला विचारलं जातं की, तुम्ही सगळ्यांना सोबत का घेत आहात? तुम्ही मोदींच्या विरोधात आहात का? मी सांगू इच्छितो की, मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाहीये. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे. मी माझ्या भारतमातेला कुणाचंही गुलाम बनू देणार नाही. हीच शपथ आज आपल्याला घ्यायची आहे” असा हल्लाबोल देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.