मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. अखंड हिंदुस्थानासाठी नेहरूंचे नखाएवढेही योगदान नाही असे खळबळजनक वक्तव्य भिडे यांनी केले आहे, त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,
यवतमाळच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित एका कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी,”अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले,” अशी टीका संभाजी भिडे यांनी येथे केली. वादानंतर आजच्या व्याख्यानात महात्मा गांधींसंदर्भात भाष्य करणे टाळले. त्याऐवजी व्याख्यानाच्या ओघात अखंड हिंदुस्थानाच्या प्रेमावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले.
यावेळी बोलताना त्यांनी,”नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते. देशासाठी नेहरूंचे नखभरही योगदान नसताना ते पंतप्रधान झाले, याचे शल्य त्यांनी व्यक्त केले. नेहरूंनी चीनसोबत केलेला ‘पंचशील’ करार हिंदुस्थानाला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला, असा आरोप त्यांनी केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळाच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमला अनेक सामाजिक, पुरोगामी, आंबेडकरवारी संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यांचे शहरात लागलेले बॅनर, पोस्टर फाडले. कार्यक्रमस्थळी अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला.