नाशिक – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वातील सरकारवर जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून तिखट हल्ला चढवला. देशातील आदिवासी, दलित, मागासवर्गीयांनी जातगणनेची मागणी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे ते म्हणाले.
राहुल यांची शहरातील शालिमार परिसरात सभा देखील झाली. त्यात त्यांनी जीएसटी, शेतकरी व आदिवासींची समस्या, जातनिहाय जनगणना, महागाई, बेरोजगारी, पेपरलिक आदी मुद्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत. त्यामुळेच त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. कारण, भाजप त्यांना आदिवासी नव्हे वनवासी मानते. या कार्यक्रमाला धनदांडगे दिसून आले. पण तिथे एकही शेतकरी, कामगार, दिनदुबळे दिसला नाही. सरकार 24 तास तुमचा खिसा कापत असताना तुम्ही काहीच बोलत नाही ही खरी समस्या आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सर्वसामान्य जनतेचे लक्ष मूळ मुद्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उद्योगपती गौतम अदामी जनतेची लूट करत आहे. या दोघांनंतर अमित शहा ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यमातून जनतेला दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल म्हणाले.
उद्योगपतींचे कर्ज माफ करू नये
22 जणांकडे 70 कोटी लोकांएवढे धन आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. हे कसे होत नाही हे मी पाहतो. सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येत नसेल तर उद्योगपतींचेही करू नये, असे राहुल गांधी म्हणाले.