नगर – पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जय भगवान महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात तपासी अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष सानप यांच्यासह स्व. आघाव यांच्या पत्नी व मुलांनी विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांची आज भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. यावेळी संजय आव्हाड, यमनाजी आघाव, सुमन आघाव, प्रेम आघाव, पंकज आघाव, तेजस्वी आघाव, विश्वास पवार, बाळासाहेब गाडे, किशोर कोहकडे, ज्ञानेश्वर आघाव, शिवकुमार पवार, बाळासाहेब घुले, शरद गीते आदी उपस्थित होते.
स्व. भाऊसाहेब आघाव हे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी होते. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला होता. गुन्हेगारांसाठी ते कर्दनकाळच होते. त्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले, ही पोलीस खात्यासाठी शरमेची बाब आहे. पोलीस खात्यातील व्यक्तींबाबत असे घडत असेल, तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल करत आघाव यांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सानप यांनी केली आहे.
सीआयडी किंवा अन्य अधिकाऱ्यांमार्फत तपास करायचा असेल तर ती करण्याची तयारी महानिरीक्षक शेखर यांनी दर्शविली. अन्य काही पुरावे असेल तर तो देण्यात यावा, आरोपी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करू, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.