पिंपरी – गांजा, अफू, अफूची बोंडे, मेफेड्रोन (एमडी) असे अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीसाठी वापरल्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात सातत्याने उघडकीस येत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये कारवायांमध्ये झालेली मोठी वाढ पाहता शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस मोठ्या प्रमाणावर कारवाई करत असले तरी शहरात अमली पदार्थ आणण्याच्या प्रकार सातत्याने सुरू असल्याचे कारवायांवरुन दिसून येत आहे.
व्यसनांना आळा घालण्यासाठी पोलीस दुहेरी कारवाई करत आहे. एकीकडे विक्री करणाऱ्यांवर पास आवळला जात आहे तर दुसरीकडे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरही कारवाई करुन चाप बसविण्याचा प्रयत्न होत आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या अनेक गर्दुल्ल्यांना पोलिसांनी वर्षभरात अटक केली आहे. मागील वर्षभरात 97 कारवाया करून 100 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांबाबत कारवाई करण्यासाठी शहर पोलीस दलात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवायांपेक्षा स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवायांची संख्या अधिक असल्याचे कारवायांची आकडेवारी सांगते.
परराज्यातून शहरात विक्रीसाठी आणलेले अंमली पदार्थ शहर पोलिसांनी पकडले आहे. 2018 ते 2021 या तीन वर्षांमध्ये 91 कारवाया करत पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केले. तर 2021 मध्ये तब्बल 108 आणि 2022 मध्ये 97 कारवाया करत पोलिसांनी अमली पदार्थांचा व्यापार रोखण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांमध्ये वाढलेल्या कारवाया आणि जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ पाहता शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे.
गांजा विक्रीत महिलाही गजाआड
अंमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यात महिला देखील अडकू लागल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. शहराच्या सर्व भागात सहज उपलब्ध होऊ लागला आहे. वर्षभरात शंभर किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. हा गांजा विविध राज्यातून शहरात आला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. काही कारवायांमध्ये पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या महिलांनाही अटक केली आहे.
पॉपी स्ट्रॉचे पाकिस्तान कनेक्शन
देशभरात अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) विकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बिष्णोई टोळीच्या पाच सदस्यांना पिंपरी-चिंचवड शहरात ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली. 20 लाखांहून अधिक किमतीचा 110 किलो पॉपी स्ट्रॉ पोलिसांनी एका महिन्यातील कारवायांमध्ये पकडला. हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान येथून शहरात आणला गेला होता. राजस्थान येथील सप्लायर्स विविध शहरांमध्ये नोकरी, मजुरी, व्यवसायाच्या निमित्ताने जाणाऱ्या लोकांना हस्तक बनवतात. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये असलेले लोक राजस्थान येथे गावी गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान ते महाराष्ट्र असा प्रवास करतो. डिटेक्शन किटशिवाय हा अफू ओळखणे कठीण आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकात काम करणारे अनुभवी पोलीस या अंमली पदार्थाची सहज ओळख पटवतात. त्यानंतर पुढील कारवाई केली जाते. मात्र नियमित चेकिंग पॉईंटला कसून चौकशी केली जात नसल्याने हा पॉपी स्ट्रॉ सहज महाराष्ट्रात येतो. बिष्णोई टोळीने आणलेल्या पॉपी स्ट्रॉचे थेट पाकिस्तान कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
अंमली पदार्थ उत्पादन बंदीबाबत आंतरराष्ट्रीय कायदा
युनायटेड नेशनने सन 1984 मध्ये अंमली पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा ठराव केला. त्यानंतर तीन वर्षांनी त्याचे आंतरराष्ट्रीय कायद्यात रूपांतर झाले. भारताने सन 1986 सालीच याबाबत कायदा केला. शासनाची परवानगी घेऊन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये खसखशीचे पीक घेता येते. त्यासाठी शासनाची परवानगीची मोठी प्रक्रिया आहे. ती सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या या पिकाची तस्करी करण्याचा गोरखधंदा करतात. याचा औषध आणि खसखस उत्पादनासाठी वापर केला जातो. मात्र राजस्थानला पाकिस्तानची सीमा आहे. त्यामुळे राजस्थान मध्ये पाकिस्तानातून हे अफू तस्करीद्वारे येत असल्याचा अंदाज पोलीस यंत्रणा लावत आहेत.