घर, परिसरातील डास उत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याची नागरिकांची जबाबदारी
शहरात आजार बळावण्याची शक्यता
पुणे – करोना बाधिताला डेंग्यूची बाधा झाल्यास त्याची प्रकृती चिंताजनक बनू शकते. काहीवेळेस जीवितहानीची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू नये म्हणून आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. करोना नियंत्रणासाठी मेहनत घेणाऱ्या या यंत्रणेपुढे यामुळे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. त्यासाठी घर आणि परिसरातील डासांची उत्पती ठिकाणे नष्ट करणे हीच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
पावसाला सुरुवात झाल्यामुळे साथीच्या आजारांसह डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा (1 जानेवारी ते 14 जुलै) डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुणियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. परंतु, डेंग्यूचा प्रादुर्भाव सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात वाढतो. मागील दीड महिन्यांपासून सलग पाऊस झालेला नाही. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे तयार झालेली नाही.
दरम्यान, मागील चार महिन्यांपासून करोना महामारीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहे. आता पावसामुळे डेंग्यूचे नवे संकट उभे राहू नये म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व यंत्रणेला सूचना देऊन कामाला सुरुवात झाली आहे. तर आरोग्य विभागाकडून वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहणी करून उत्पत्ती ठिकाणे नष्ट करत येत आहे.
महापालिका स्तरावर स्वच्छतेचे काम
1 जानेवारी ते 14 जुलै 2020 पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा मिळून डेंग्युचे 86 रुग्ण सापडले आहेत. तर गतवर्षी या कालावधीमध्ये 204 रुग्ण होते. डेंग्युसह चिकनगुणिया आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या यंदा तुलनेने कमी आहे. मात्र, सध्या करोना संसर्गामध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून जनजागृती केली जात आहे. उत्पत्तीची ठिकाणी नष्ट केली जात असून, त्याबाबत महापालिका आणि जिल्हा परिषद स्तरावर स्वच्छतेचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अजय बेंद्रे यांनी दिली.
डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावे
– डासांची पैदास होणारी सर्व ठिकाणे नष्ट करावी (कुंड्या, टायर, टेरेसवरील खराब वस्तू)
– पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावे
– डास चावू नये यासाठी क्रीम लावू शकता
– दोन दिवसांपेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नका
– डासांच्या आळ्या दिसल्यास तत्काळ नष्ट करावे, ते शक्य नसल्यास टेमीफॉस टाकणे
करोनाबाधित व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य आजार असल्यास उपचारादरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक होऊ शकते. तसेच डेंग्यू, चिकनगुणिया आणि मलेरिया यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यूमुळे प्लेटलेट कमी झाल्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होतो. त्याचा परिणाम बाधित व्यक्तींवर अधिक होऊ शकतो.
– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.