उमेदवार विनापरवानाच घेतात चौकसभा : भरारी पथके नावालाच; नाकाबंदी सोईनुसार
नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन होतांना दिसत आहे. त्यानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र बट्ट्याबोळ झाला असल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवार विनापरवानाच कोठेही कधीही गावागावांमध्ये चौकसभा घेत आहेत. वाहनांच्या तपासणीसाठी करण्यात आलेली नाकाबंदी देखील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीबाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी होत नाही. ती स्थिती भरारी पथकांची आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार परवानगी न घेताच गावगावांमध्ये चौकसभा घेत आहे.
याकडे भरारी पथकांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. दररोजच्या प्रचाराचे नियोजन उमेदवार करीत असून गावनिहाय प्रचार फेरी, बैठका व चौकसभा घेण्यात येत आहे. परंतू यात चौकसभा व प्रचार फेरीच्या परवानग्या आवश्यक असतांनाही त्या घेण्यात येत नाही. भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे दिलेल्या कामांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जात नसल्याचे निर्दशनास आले आहे. विशेष म्हणजे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी देखील एकमेकांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. त्यामुळे सध्या तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्व अलबेल चालले आहे. नाकाबंदी करण्याबाबत निवडणूक आयोगाने सुचना दिल्या आहे.
नाकाबंदी कधी, कोठे करण्यात यावी याचीठिकाणी निश्चित करून देण्यात आले असून वेळा देखील ठरवून दिल्या आहे. परंतू नाकाबंदीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी आपल्या सोइनुसार नाकाबंदी करतांना दिसतात. ज्या ठिकाणी चार कर्मचारी आवश्यक आहे. तेथे एकच कर्मचारी नाकाबंदीसाठी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आलेली वाहना तपासणी करणे शक्य होत नाही. परिणामी अनेक वाहन तपासणी न होताच शहर व गावात प्रवेश करीत असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रत्येकी विधानसभा निहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण या मतदारसंघात अधिकारी व कर्मचारी आपल्या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे उमेदवारांचे फावले असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे सध्या तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघा आदर्श आचारसंहितेचा बोजवाराच उडाला असल्याचे दिसत आहे.