वाठार स्टेशन – वाठार स्टेशन तसेच परिसरातील विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, नलवडेवाडी, बिचुकले, तळीये, तडवळे या गावांना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसारख्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुळातच गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांसह शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने उत्तर कोरेगावमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्ण उत्तर कोरेगावातील सगळ्या गावांमध्ये ओला दुष्काळाचे चिन्ह निर्माण झाले आहे. खरीब हंगामातील पिकेसुद्धा अति पावसामुळे पूर्ण जमीनदोस्त झाली होती. वाठार स्टेशन तसेच परिसरात शेतकरी घेवड्याचे पीक मोठ्या प्रमाणात करतात. घेवड्याच्या पिकाला दिल्ली बाजारपेठेतून भरपूर मागणी असते. त्यामुळे पैसे देणारे हे पीक अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले.
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पिके अतिपर्जन्यामुळे नष्ट झाली, तसेच भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांची पिके कुजून गेली. त्यामुळे यंदाची दिवाळी कडू झाली. त्यामुळे शेतकरी राजा यावर्षी पाऊस पडूनसुद्धा चिंतेत आहे. उत्तर कोरेगावमध्ये दरवर्षी कमी प्रमाणात पाऊस असतो. परंतु यंदा जून महिन्यापासून सुरु झालेला पाउस अजून थांबायला मागत नाही. त्यामुळे सगळीकडे ओल्या दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे.
तसेच खरीप हंगामसुद्धा निघून चालला आहे. शेतात वापसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनी पेरणी विना पडून आहेत, शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी हात उसने पैसे घेऊन दिवाळी साजरी केली ते पैसे परत करण्यासाठी शेतकऱ्यांच्याकडे पैसा उपलब्ध नाही, शेतकरी अक्षरशः कर्जबाजारी होत चालला आहे. तरी महाराष्ट्र शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन कोरेगावातील संपूर्ण गावे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावीत, अशी मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.