आळंदी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षच
आळंदी – आळंदी-मरकळ रस्त्यावरील माऊली पार्क सोसायटी ही एकेकाळी उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखली जायची. मात्र गेली दहा वर्षापासून याठिकाणी शिजत असलेले राजकारण यामुळेच या सोसायटीतील रस्ता हा पालिकेने दुर्लक्षित केला असून तो दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असल्याने या सोसायटीत राहणाऱ्यांचे कंबरडे या खड्ड्यांमुळे मोडले आहे.
गेल्या महिन्यात येथील स्थानिक नगरसेवक तुषार घुंडरे यांनी या रस्त्या संदर्भात एक दिवसीय उपोषण केले होते. तरी देखील पालिकेने याची दखल घेतली नाही, उलटपक्षी भाजपचा सत्ताधाऱ्यांनी सांगितले की, नगरसेवकाने रस्त्यासाठी उपोषणाला बसावे ही शरमेची बाब आहे. अधिकारी पदाधिकारी व काही स्थानिकांमुळे या रस्त्यावर बरेच राजकारण शिजत असल्याने येथील रहिवाशांना गेली दहा वर्षांपासून त्याचा त्रास भोगावा लागत आहे.
नगरसेवक तुषार घुंडरे म्हणाले की, आम्ही या रस्त्यासंदर्भात गेल्या महिन्यात उपोषण करून देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही. कार्तिकीवारी 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे तरी पालिकेने येथे असणारे मोठे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात का होईना त्वरित बुजवावेत, अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. येत्या दहा दिवसांत पालिकेने यावर तात्पुरती का होईना काही उपाययोजना न केल्यास ऐन यात्राकाळात तीव्र आंदोलन या रस्त्यासाठी छेडले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.