मुंबई : परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परत आणणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला अद्याप अधिकृतरित्या कळवले नसल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात असलेल्या मजुरांना नेण्यासाठी किती बसेस आणि कुठे येणार याबाबत अधिकृत्यरित्या सरकारसोबत चर्चा झालेली नाही किंवा सरकारला कळवलेले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात राजस्थानातील कोटा इथे अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना खास बसची सोय करुन आपापल्या घरी परत आणले. त्यानंतर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांनांही परत आणणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे कोटामध्ये अडकलेल्या दीड ते दोन हजार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. परंतु उत्तर प्रदेशातील मजुरांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात अद्याप चर्चा झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.