मंचर -करोना बरा होण्यासाठी जर कोणी घरात राहून ऑक्सिजनचा वापर करत असेल तर ते धोकादायक आहे. ऑक्सिजन थेरपी फक्त हॉस्पिटलमध्येच डॉक्टर देऊ शकतात.अशा स्वरुपात घरात वापर केल्यास डोळ्याला, मेंदूला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी ऑक्सिजन घरी वापरु नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
अवसरी फाटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील करोनासंदर्भात सद्यस्थितीची माहिती प्रसारमाध्यमांना आयुष प्रसाद यांनी रविवारी (दि. 6) दिली. नागरिकांनी सॅनिटायझर आणि साबणाचा वापर, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर हे नियम पाळले तर आपण स्वतःला, कुटुंबाला, समाजाला करोनामुक्त ठेवू शकतो. कोविड केअर सेंटर याठिकाणी करोना पॉझिटिव्ह लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ठेवले जातात. समर्पित कोविड आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची व्यवस्था असते त्यामुळे याठिकाणी तीव्र लक्षणे असलेली रुग्ण भरती केले जातात. तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाच टक्के ग्रामपंचायतींमध्येच 80 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. सर्व वैद्यकीय उपचारही उपलब्ध आहेत; परंतु सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. जिल्हा लवकरात लवकर करोनामुक्त करायचा आहे. आंबेगाव तालुक्यातील मृत्यूदर 3.18 आहे. 45 मृत्यू पैकी दोन नागरिक जर सोडले तर बाकीचे मृत्यू हे ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी ग्रस्त होते. ज्येष्ठ नागरिक आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
1 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्ह्यामध्ये मागील पाच ते सहा दिवसांत पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या 1 हजार 405 ग्रामपंचायत हद्दीतील 40 हजार नागरिकांकडून करोनाच्या संदर्भात नियम न पाळल्याबद्दल 1 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.