ओतूर -जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरणाचे पाणी हे केवळ जुन्नर तालुक्यासाठीच आहे आणि ते कोणालाही दिले जाणार नाही. कोणी काही म्हणत असले तरी जनतेने यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.
गेली काही दिवसांपासून चिल्हेवाडी धरणातील पाणी हे नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात पाठवले जाणार असल्याचा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. यावर आमदार बेनके यांनी हा खुलासा केला आहे.
बेनके म्हणाले, एक टीएमसीपेक्षाही कमी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील पाणी इतर कोणालाही देता येणार नाही. या धरणातील पाणीसाठ्याचे संपूर्ण नियोजन आधीच झालेले आहे. त्यानुसार या धरणाचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे फक्त जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या पाण्यावर तालुक्यातील 6372 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
चिल्हेवाडी धरण तयार करतानाच यामधील होणाऱ्या पाणीसाठ्याचे नियोजन हे अभ्यासपूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार पावसाळ्यात कमीत कमी सव्वादोन टीएमसी पाणी नदीद्वारे कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणात सोडणे आणि त्यानंतर धरणाच्या साठवण क्षमतेप्रमाणे 0.90 टीएमसी पाणी शिल्लक ठेवणे. मागणीनुसार हे पाणी चिल्हेवाडी धरणातून मांडवी नदीला सोडणे तसेच बंदिस्त पाइपलाइनद्वारे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी दिले जाणार आहे.
त्यासाठी इस्त्राइलच्या धर्तीवर 39.080 मीटर बंद पाइपलाइनचे काम सुरू आहे. यातील 21 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर 12.470 किलोमीटर काम हे सलग पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल.
धरणातील पाणी अकोला किंवा संगमनेर तालुक्याला देण्यासाठी कोणताच पत्रव्यवहार झालेला नाही. पाणीसाठ्याचे नियोजन हे आधीच झालेले आहे.
-संभाजी माने, कार्यकारी अभियंता डिंभे धरण विभाग