मेघश्री दळवी
अंतराळातली केवळ आपणच एकमेव सजीववस्ती आहोत की इतरत्र एलियन्स आहेत, हा सर्वांना पडणारा प्रश्न. सेटी (सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल इंटेलिजन्स) ही संस्था 1984 पासून याच दिशेने वेध घेत आहे. तिला साथ देत स्टीव्हन हॉकिंग्ज आणि युरी मिल्नर यांनी एलियन्सच्या शोधासाठी ब्रेकथ्रू लिसन या प्रकल्पाला पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली होती.
अंतराळातून येणाऱ्या रेडिओ संदेशाचा मागोवा घेणाऱ्या या प्रकल्पातून गेलं वर्ष सरता सरता एक महत्त्वाची बातमी आली आहे. त्यांनी प्रॉक्सिमा सेंटॉरीकडून येणारा एक रेडिओ संदेश टिपला आहे. पहिल्यांदाच असा संदेश मिळाला असल्याने एखाद्या एलियन संस्कृतीच्या अस्तित्वाची शक्यता दिसत आहे, आणि त्याने संशोधकांच्या जगात खळबळ माजली आहे.
प्रॉक्सिमा सेंटॉरी हा रेड ऍड्वार्फ तारा आपल्यापासून 4.35 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजेच प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर तिथे पोहोचायला आपल्याला 4.35 वर्षे लागतील. अर्थात, इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करणं शक्य नसल्याने प्रत्यक्षात तिथे पोहोचायला कितीतरी हजार वर्षे लागतील. असं असूनही त्या तारकामालेबाबत आपल्याला विशेष आस्था आहे, कारण अतिभव्य अशा अंतराळात तो आपला सर्वात जवळचा शेजारी आहे.
ब्रेकथ्रू लिसन कॅन्डीडेट-1 असं नाव दिलेला हा संदेश मे 2019 मध्ये 982 चकू फ्रीक्वन्सीवर अगदी थोड्या काळाकरता येऊन गेला. आता त्याची बातमी होण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक तर त्याचं सखोल विश्लेषण सुरू आहे, त्यावर संशोधन प्रबंध येऊ घातले आहेत, आणि त्यात हा संदेश प्रॉक्सिमा सेंटॉरीच्या दिशेने आल्याची ठाम शक्यता दिसत आहे. दुसरं कारण म्हणजे काही शास्त्रज्ञांनी तो एलियन संदेश असल्याबाबत शंका उपस्थित केली होती, पण या संदेशामागे असू शकतील अशा सर्व कारणांचा अभ्यास करूनही त्याबाबत निश्चित उत्तर मिळालेलं नाही.
मग ही खरोखरच अंतराळातली हाक असू शकते का? कोणी आपल्याला आवाज दिला असेल का? कशासाठी? आणि तोच किंवा दुसरा संदेश त्या दिशेने पुन्हा का आला नसेल? प्रॉक्सिमा सेंटॉरी ताऱ्याभोवती फिरणारे प्रॉक्सिमा सेंटॉरी बी आणि सी असे दोन ग्रह आहेत. त्यापैकी प्रॉक्सिमा सेंटॉरी बी या ग्रहावर सजीववस्तीसाठी अनुरूप परिस्थिती आहे.
प्रॉक्सिमा सेंटॉरी ताऱ्यापासून योग्य अंतरावर असल्याने तिथे पाणी द्रवस्वरूपात असू शकतं आणि सजीवांना झेपेल असं तापमान असल्याने तिथे ते तग धरू शकतात. तिथे खरोखरच एलियन्स असतील तर त्यांची तंत्रज्ञानाची झेप कुठपर्यंत पोहोचली असेल? त्यांना आपला शोध लागला असेल का? आपण तिथवर यानं पाठवू शकू का? त्यांची यानं इथे येऊन उतरतील का? ते मैत्रीचा हात पुढे करतील की आपल्यावर स्वारी करतील? असे अनेक प्रश्न त्यानिमित्ताने पुन्हा चर्चेला आले आहेत.