अरुण गोखले
जीवनातला हा सुख दु:खाचा खेळ कसा ओळखायचा. तो विवेकाने कसा खेळायचा, ही आगळी वेगळी जीवनकला जर आपल्याला माहीत करून घ्यायची असेल, ती शिकायची असेल तर त्यासाठी आपल्याला सांधू-संत-सत्पुरुष आणि सद्गुरू ह्यांच्यापाशीच जावे लागते.
त्यांची शिकवण त्यांचा बोध, त्यांनी दिलेली ज्ञानदृष्टी हीच आपल्याला सुखातलं दु:ख आणि दुःखातले सुख कसे शोधायचं, आणि आपल्या मनाची शांती कशी अखंडित राखायची हे शिकवून जाते. त्यांच्या कृपेनेच सुखातले दु:ख म्हणजे आपल्या उश्याशी असलेले धनाचे आपलेच गाठोडे हे ते धन कोणीतरी चोरून घेईल, या काळजी आणि चिंतेने आपलीच सुखाची झोप कसे उडवते. किमती गाद्यावर लोळतानाही सुख निद्रेसाठी डोळ्यात पाणी का आणावे लागते, झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात, ते आपल्याला समजावून देतात, सांगतात, शिकवतात. दु:खाच्या डोंगरातून वाहणारा सुखाचा झरा कसा शोधायचा, त्याचे समाधानाचे पाणी पिऊन कशी तृप्तीची ढेकर द्यायची, हे त्यांच्याकडूनच शिकावे लागते.
ते आपल्याला सांगतात की, “बाबारे! दु:खातही सुख कसं लपलेलं हे जर तुला जाणून घ्यायचं असेल, तर ते बाळासाठी नऊ महिने कष्ट, यातना, क्लेष याचे दु:ख भोगणाऱ्या आणि बाळाच्या जन्माने सुखावणाऱ्या मातेला विचारा.’
साधुसंत सांगतात, “जेव्हा एखादा शेतकरी हा आपले फुललेले, मस्तपणे वाऱ्यावर डुलणारे शिवार पाहतो, तेव्हा त्याला ते पाहून त्याने आजवर वेचलेल्या कष्टाचा, दुःखाचा मेहनतीचा कसा विसर पडतो आणि त्याला कसा आणि कोणत्या समाधानाचा आनंद होतो, ते त्याला विचारा.’
साधुसंत सांगतात, “एखाद्या मोलकरणीची मुलगी अधिकारी होते. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी जे कष्ट, जी उपासमार सहन केलेली असते, स्वत:च्या हौसे मौजेला जी मुरड घातलेली असते. त्याचे ते अश्रू असतात का, ते त्यांचे श्रम साफल्याचे सुखा-समाधानाचे अश्रू असतात.’
सद्गुरू सांगतात, “त्यांना हेच शिकवायचे असते की सुख आणि दुःख हे जीवनात असणारच आहे. ते भोगत असतानाही आपलं आंतरिक समाधान, शांती आणि आनंद हा कायम कसा टिकवायचा हीच जगण्याची कला आहे. त्यासाठीच आपल्याला आधी हे कौशल्य आत्मसात करून घ्यावे लागते की, मी माझ्या जीवनात सुखी समाधानी होण्यासाठी ह्या प्रपंच आणि परमार्थाची योग्य सांगड घालणार.’