पुसेसावळी – मैत्री हा शब्द आठवताच प्रथम डोळ्यांसमोर उभी राहते ती कृष्ण- सुदामा यांची मैत्री. महाभारताच्या काळातली ही मैत्री. पण ती आजही अजरामर होऊन सर्व देशवासियांच्या मनात रुजली आहे. तशीच मैत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी या छोट्याश्या खेडेगावातील लक्ष्मण शिंदे यांची आहे. मैत्रीचे अनोखे नाते मुख्यमंत्र्यांच्या दरे गावच्या निवासस्थानी अनेकांना पाहावयास मिळाली आणि कित्येकांच्या भुवया उंचवल्या.
एवढ्या गर्दीत मुख्यमंत्री शिंदे यांना आपला मित्र दिसला. अरे…लक्ष्मण सकाळपासून जेवला नाही. त्याची जेवणाची व्यवस्था करा असे म्हणत मुख्यमंत्र्यानी फर्मान सोडले. मुख्यमंत्र्यांचे कुटूंबीय आणि लक्ष्मण शिंदे यांच्या कुटूंबीयांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. गावाकडच्या गप्पा मारल्या आणि लक्ष्मण गोरेगाव वांगीला तुझ्या घरी येणार व कार्यक्रमही घेणार असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
लक्ष्मण शिंदे यांच्या पत्नी हेमलता शिंदे, मुलगा विजयेंद्र शिंदे व स्नूषा अमृता शिंदे यांची आपुलकीने चौकशी करुन पुण्यातील व्यवसायाच्या कार्यक्रमास वेळ देण्याचे कबुल केले. यापुर्वी आयोजित केलेल्या व अचानक रद्द झालेल्या दौऱ्याची चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवलेल्या आपुलकीने डोळे डबडबले आणि आपण मनोमन सुखावून गेलो, भावूक झालो असे लक्ष्मणतात्यांनी सांगितले.
बंधनापलिकडची मैत्री
एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा हितचिंतक असते, एकमेकांच्या हिताची त्यांच्यात इच्छा असते आणि एकमेकांच्या आनंद, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न करणे, अशी 1979 पासून एकनाथ शिंदे व लक्ष्मण शिंदे यांची मैत्री आजही तितकीच मजबूत व घट्ट आहे. विचारांचे आदान-प्रदान, एकमेकांची सुख- दुःखं जाणून त्यावर केलेले चिंतन हे यांच्या मैत्रीचे भांडवल आहे. एकमेकांची भेट हे मैत्रीचं मुख्य सूत्र. मैत्रीला कधीही कुठलीही बंधन नसते, हे यांच्या मैत्रीवरुन अधोरेखित झाले आहे.