पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर शाश्वत आणि पर्यावरण पूरक होण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात 16 ठिकाणी अध्याधुनिक पध्दतीचे कचरा स्थानांतरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यामधील कासारवाडी, भोसरीतील गवळीमाथा आणि काळेवाडी या तिन ठिकाणी केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. कचरा स्थानांतर केंद्र उभारण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाकडून 46 कोटी रूपयांचा निधी आल्याची माहिती पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे 1200 टनापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे. हा कचरा मोशीतील कचरा डेपोमध्ये डंपिंग केला जात आहे. मात्र,कचरा डेपोमध्ये कचरा घेऊन जाण्यापूर्वी शहरातील विविध भागातील 30 संकलन केंद्राच्या माध्यमातून कंटेनरमध्ये भरून कचरा नेला जातो. मात्र, उघड्यावर असलेल्या या जुन्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहर शाश्वत आणि पर्यावरण पूरक होण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील 16 ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने कचरा स्थानांतर केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामधील कासारवाडी, भोसरीतील गवळीमाथा आणि काळेवाडीतील केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी दररोज 200 टन कचरा ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ओला आणि सुका कचरा घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र कंटेनरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्र पूर्णतः बंदिस्त
शहराची वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे प्रमाण पाहता प्रत्येक प्रभागात दोन कचरा स्थानांतर केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, महापालिका सुरूवातीला 16 ठिकाणी केंद्र उभारणार आहे. हे केंद्र उभारण्यासाठी नागरिकांचा विरोध होऊ लागला आहे. मात्र, हे केंद्र पूर्णतः बंदिस्त असून कचऱ्याचा परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. एक केंद्र उभारण्यासाठी सुमारे 6 कोटींचा खर्च येत आहे. महापालिकेला केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाकडून आत्तापर्यंत 46 कोटी मिळाले आहे. यापुढील काळातही आणखी निधी मिळणार असल्याची माहिती सह शहर अभियंता कुलकर्णी यांनी दिली.
या भागात उभारणार केंद्र
कासारवाडी, गवळीमाथा आणि काळेवाडी या तीन ठिकाणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यापुढील काळात सांगवी, चिंचवड, आकुर्डी, चोविसावाडी, किवळे आणि बोऱ्हाडेवाडीतील कचरा स्थानांतर केंद्राचे कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.
कचरा स्थानांतर केंद्र हे अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पध्दतीने उभारण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही वासाचा अथवा इतर त्रास होत नाही. त्यामुळे नागरिकांनी याला विरोध करू नये. मध्य प्रदेशातील इंदोर शहरापेक्षा उच्च दर्जाचे केंद्र उभारण्यात येत आहेत.
-संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग