नवी दिल्ली: देशाच्या सुमारे अकरा राज्यांमध्ये पुरामुळे मोठेच नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यांचे एक पथक लवकच या राज्यांच्या प्रत्यक्ष दौऱ्यावर जाणार आहे. तेथील नुकसानीचा अंदाज घेऊन हे पथक मदतीच्या संबंधात केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे.
गृहमंत्रालयाचे जॉईन्ट सेक्रेटरी प्रकाश यांच्या नेतृत्वाखालील एक पथक येत्या शनिवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑगस्टला केंद्रीय मंत्र्यांच्या एका बैठकीत देशातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
प्रत्यक्ष राज्यांना भेट देऊन तेथील स्थितीची पहाणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार आता दिल्लीतील ही पथके आसाम, मेघालय, त्रिपुरा, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांना भेटी देणार आहे. या राज्यांकडून नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त व्हायच्या आतच ही पथके या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापुर्वी राज्यांकडून अहवाल आल्यानंतर ही पथके संबंधीत राज्यांकडे जात असत.