स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधातच : पदांच्या वाटपातही दुजाभाव
रमेश जाधव
रांजणी – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे; परंतु आंबेगाव तालुक्यात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे भवितव्य टांगणीला लागल्याचे दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अद्यापही राजकीय पातळीवर एकत्र येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर जनतेने सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपला कौल दिला होता; परंतु सेना-भाजप दोघेही मुख्यमंत्री पदावर अडून राहिले. त्यानंतर शरद पवार यांच्या राजकीय खेळीने सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र राज्यातील बहुतांशी ठिकाणी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे तीनही राजकीय पक्ष एकत्र येत नसल्याने स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीचे भवितव्य टांगणीला असल्याचे दिसून येते.
आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहिली तर नुकतीच आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सहा, तर शिवसेनेचे 4 सदस्य आहेत, असे असताना राज्य पातळीवर महाविकास आघाडी झाली असताना तालुका पातळीवर मात्र शिवसेनेच्या सदस्याला उपसभापती पदाची संधी मिळाली नाही. तालुक्यात सभापती आणि उपसभापती पद अशी दोन्ही पदे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वत: कडे ठेवली.
त्यांचे सुत जुळणार का?
महाविकास आघाडीचे दिलीप वळसे पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क व कामगार मंत्री पद मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात स्थानिक पातळीवर शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय सुत जमणार का? हा येणारा काळच ठरवेल; परंतु सध्यातरी तालुक्यात महाविकास आघाडीला भवितव्य नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
दादांचा शब्द खरा ठरणार का ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखान्यांच्या निवडणुका महाविकास आघाडी करून लढण्याचे यापूर्वी जाहिर केले आहे. त्यांचा शब्द कितपत खरा ठरेल हे आताच सांगणे कठीण आहे. काही महिन्यांवर तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणुकही होणार आहे. भीमाशंकर साखर कारखान्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पूर्णपणे राजकीय वर्चस्व असून राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्माप्रमाणे भीमाशंकर साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिवेसना पक्षाला सामावून घेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध करणार का? हे पाहणेही आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतही आघाडी होण्याची शक्यता धूसर
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत तसेच विषय समित्यांच्या सभापती निवडीतही केवळ राष्ट्रवादीच्या सदस्यांनाच त्या-त्या पदांवर संधी मिळाली. तेथेही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डावलले गेले. तोच कित्ता ग्रामपंचायत निवडणुकीतही गिरवला जाण्याची शक्यता आहे. आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार का? याकडेही जनतेच्या जरा लागून राहिल्या आहेत. बहुतांशी ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व आपल्या पॅनलमध्ये शिवसेनेला सामावून घेईल ही शक्यता अतिशय धूसर वाटते.