मुंबई – करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल कारण साधारण 80 टक्के मुंबईकर करोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता टाटा मुलभूत संशोधन संस्था अर्थात टीआयएफआरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे मुंबईकरांना करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल असा अंदाज या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, या अभ्यासात दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या रुग्णांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा करोना होण्याचा धोकाही असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशात करोनाचा शिरकाव होऊन आता दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. अशात ज्यांना पहिल्या लाटेत करोना होऊन गेला आहे त्यांच्यातील अँटिबॉडिज आता कमी झाले असतील, हे लक्षात घेता अशांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
ज्यांना पहिल्या लाटेत करोना होऊन गेला आहे अशा नागरिकांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसे ठेवता येईल याचा विचार करायला हवा आहे, तसेच ज्यांना अजून कोरोनाची लागण झालेली नाही, अशा 20 टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरजही नमुद करण्यात आली आहे.
साधारण सप्टेंबरमध्ये आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल. पण त्याआधी नवा कोणताही व्हेरिएंट आला नाही, तसेच जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकऱण झालं, आणि लस 75 ते 95 टक्के प्रभावी ठरली तर तिसऱ्या लाटेचा धोका आणि तीव्रता कमी होऊ शकते असंही या अभ्यासात म्हटले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
– करोनाच्या तिसऱ्या लाटेवर तीन घटक परिणाम करणारे ठरतील
– नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी ठरेल
– राज्यातले 60 टक्क्यांहून अधिक निर्बंध उठवणे
- कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन