किडनी निकामी होण्याचा होता धोका : अंधूक होऊ लागली होती डाव्या डोळ्याची दृष्टी
स्नायूंना तीव्र इजा
रुग्णाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये स्नायूंना गंभीर इजा पोहोचल्यामुळे त्याच्या मूत्रामध्ये मसल प्रोटीन्स (मायोग्लोबिनुरिया) असल्याचे आढळले. त्याला इंट्रावस्क्युलर रक्तस्त्राव होऊ लागला आणि यकृताला देखील इजा झाली. उपचार सुरू केल्यावर तो चांगला प्रतिसाद देऊ लागला आणि त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला घरी सोडण्यात आले. याबाबत डॉ. कल्याण गौड म्हणाले की, मधमाशांच्या दंशानंतर रॅब्डोमायोलिसिस (स्नायूंची तीव्र इजा) अतिशय दुर्मीळपणे आढळते आणि जर त्याचा वेळेवर उपचार केला नाही तर त्यामुळे किडनी निकामी होऊन रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मधमाश्यांनी हल्ला केल्यास तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
पिंपरी – मधमाशांचा हल्ला कधी-कधी जिवावर बेततो, असे म्हटले जाते. सर्वसामान्यांचा समज असतो की, मधमाशा चावल्या तर थोडा वेळ दाह होतो आणि नंतर ठीक होते. परंतु मधमाशांचे दंश कित्येकदा प्राणघातक ठरतात. याचा प्रत्यय पिंपरी येथील एका तरुणाला आला. या तरुणावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे किडनी निकामी होण्याची भीती निर्माण झाली होती. मधमाश्यांचा हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची किडनी निकामी होण्यापासून वाचवण्यात आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आहे.
मधमाशांच्या शेकडो दंशानंतर स्थानिक हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार घेतल्यानंतर देखील त्याची प्रकृती खालावत राहिल्याने त्याला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत त्याच्या किडनी निकामी होण्यापासून रोखले. पिंपरीतील 24 वर्षाचा तरूण आपल्या कुटुंबियांसमवेत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला होता. तिथे त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. त्याच्या डाव्या डोळ्यासह शरीराच्या विविध भागांवर मधमाशांनी दंश केला होता. त्याला सूजेसोबत प्रचंड वेदना होत होत्या. मधमाश्यांच्या दंशांमुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. त्याचा हार्ट रेटही वाढला होता आणि त्य्ाच्या डाव्या डोळ्याची दृष्टी अंधूक होण्यासोबत लघवी लालसर रंगाची होण्याची समस्या त्याला होत होती. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेत त्याला लगेच आयसीयूमध्ये हलवून डॉ. कल्याण गौड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
अशा गुंतागुंतीच्या केसमध्ये उच्च वैद्यकीय केंद्रांमध्ये नेणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार होऊन समस्या आणि मृत्यू टाळता येऊ शकतो. मधमाशा चावल्यावर आवश्यक उपचार देणारी सक्षम टीम असलेल्या टर्शरी केअर इन्स्टिट्यूटमध्ये सुरुवातीलाच नेल्यास मृत्यू होण्याचा धोका टळतो.
– रेखा दुबे, सीईओ, आदित्य बिर्ला हॉस्पिटल