नवी दिल्ली : कोरगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला आहे. तसेच या दोघांनाही शरण येण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवाय, पासपोर्ट तातडीने पोलिसांकडे जमा करण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम आर शहा यांच्या खंडपीठाने दोन्ही कार्यकर्त्यांना तीन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाने 6 मार्च रोजी दोन्ही कार्यकर्त्यांना अटकेपासून प्रदान केलेल्या सुरक्षेचा कालावधी वाढवला होता. तेलतुंबडे आणि नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यांची ही याचिका सुरुवातील पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती.
मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने या दोघांच्याही अटकेला स्थगिती दिली होती. 31 डिसेंबर 2018 रोजी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात त्यांचा हात असल्याच्या आरोपात जानेवारी 2018 मध्ये या दोघांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्गार परिषदेत देण्यात आलेल्या चिथावणीखोर भाषणांनंतरच कोरेगाव-भीमा दंगल उसळल्याचा पोलिसांचा आरोप आहे.