पुणे – शरजिल उस्मानीच्या धर्मामुळे त्याला आज विकृत, हिंस्त्र आणि द्वेषपूर्ण तऱ्हेने लक्ष केले जात आहे. एल्गार परिषदेतील त्याच्या भाषणामुळे काही लोकांकडून वादंग उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर परिषदेचे आयोजक असलेल्या भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान राज्य समन्वय समितीने शरजिल उस्मानीसोबत असल्याची भूमिका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
शरजिल हा एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधातील आंदोलनात सक्रीय सहभागी होता. उत्तरप्रदेश सरकारने अनेक तरुणांवर हिंसाचाराचे आरोप लावून त्यांना अटक केली. त्यात शरजिलचा समावेश होता. मुस्लिम आणि दलित जनतेला तेथील सरकार टार्गेट करत आहे.
पुण्यातील त्यांच्या भाषणातील एक वाक्य उचलून त्याचे अवडंबर माजवले जात आहे. तो ते वाक्य बोलण्याअगोदर आणि नंतर काय बोलला हे अभ्यासावे लागेल. आरएसएस, भाजप आणि इतर काही संघटना द्वेष पसरवत असल्याचे समितीने त्याच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एल्गार परिषदेचा उद्देश हा संविधान, लोकशाही वाचवण्याचा आहे. देशात समता, स्वातंत्र्य, आणि बंधुभाव टिकावा असे वाटते. 2014 मध्ये ज्यावेळी देशाच्या सत्तेत भाजप सरकार आले, तेव्हा या सावटाची जाणीव खोल झाली. खर्डा, जवखेडा, उना, रोहित वेमुला, जीशा, डेल्टा, अनिता, जीब, अखलाख, जुनेद, पहलू, असे अनेक जण सावटाचे बळी ठरल्याचे पत्रकात म्हटले आहे.