पुणे – एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असलेल्या व जमावाला भडकावल्याच्या आरोपाखाली कबीर कला मंचच्या दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी ताब्यात घेतले आहे.
केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास जानेवारीमध्ये ‘एनआयए’कडे सोपवला होता. ‘एनआयए’कडे एल्गार परिषदेचा तपास सोपवण्यात आल्यानंतरही या प्रकरणातील ही पहिलीच कारवाई आहे. दि. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या दोन कार्यकर्त्यांचा सहभाग होता, या परिषदेच्या माध्यमातून जमावाला भडकाविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पुणे पोलिसांकडे तपास असताना 17 एप्रिल 2018 रोजी पुणे पोलिसांनी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे एकाचवेळी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकले होते. त्यात वाकड येथील एका कार्यकर्त्याच्या घरातून पोलिसांनी सीडी, पुस्तके, पेन ड्राईव्ह अशा वस्तू जप्त केल्या होत्या.
दरम्यान, या कार्यकर्त्यांना दर रविवारी वाकड पोलीस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, रविवारी तो आला नसल्याचे समजते. मात्र, एनआयएकडून अद्याप त्यांच्याविषयीही काहीही माहिती दिलेली नाही.