अबुधाबी – जागतिक क्रिकेटचा शिरोमणी मानली जात असलेली विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून (शनिवार,दि. 23) सुरु होत आहे. ओमान व अमिरातीत होत असलेल्या या झटपट क्रिकेटच्या जागतिक कुंभमेळ्यासाठी 12 संघ सज्ज बनले आहेत.
अगदी कमी कालावधीत तुफान लोकप्रीय झालेल्या या क्रिकेटच्या प्रकारातील ही सर्वोच्च स्पर्धा असून स्पर्धेचे यजमानपद जरी भारताकडे असले तरीही करोनाचा धोका कायम असल्याने आयोजन मात्र, आखातात करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पात्रता साखळी फेरीचे सामने पार पडले असून आता उद्यापासून स्पर्धेच्या मुख्य फेरीला म्हणजेच सुपर 12 गटातील सामन्यांना प्रारंभ होत आहे.
या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका तसेच इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात सलामीचे सामने होत आहेत. टी-20 विश्वकरंडक स्प्धेला 2007 साली सुरुवात झाली व पहिल्याच स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने मिळवले. यानंतर 2009 साली पाकिस्तान, 2010 साली इंग्लंड, 2012 साली वेस्ट इंडिज, 2014 साली श्रीलंका व 2016 साली पुन्हा वेस्ट इंडिजने ही स्पर्धा जिंकली. स्पर्धा गेल्यावर्षी 2020 साली होणार होती. मात्र, जगभरात करोनाचा धोका असल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
आता यंदा या स्पर्धेला नवा विजेता मिळणार का भारतीय संघ यजमानपदात विजेतेपदाचा मानकरी ठरणार याचीच उत्कंठा लागली आहे. भारतीय संघाची या स्पर्धेतील मोहिम परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध येत्या रविवारी होत असलेल्या सामन्याने सुरु होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघ मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच या स्पर्धेनंतर कोहली भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्वही सोडणार असल्याने त्याच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपदही कोहलीच्या नावावर नोंदले जाणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.