मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळाले व आमच्या खेळाडूंच्या मेहनतीला यश आले, त्याचाच सर्वाधिक आनंद आहे. अर्थात आम्ही चुकांमधून शिकलो व अपयश मागे टाकून या स्पर्धेतील आगामी लढतींसाठी सज्ज झालो हेच आमच्या यशाचे गुपित आहे, अशा शब्दात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या भावना व्यक्त केल्या.
या स्पर्धेला आम्ही अत्यंत सकारात्मकतेने सुरुवात केली होती. मात्र, जेव्हा आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागला तेव्हा मात्र, आमच्यावर मोठे दडपण आले होते. त्यावेळी आम्ही सगळे खेळाडू एकत्र आलो व या पराभूत मानसिकतेतून बाहेर पडून सर्वोत्तम खेळ करण्यासाठी कटिबद्ध झालो, असेही स्टोक्स म्हणाला.
कोणत्याही मोठ्या तसेच महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होताना पराभवाची अपेक्षा मनात ठेवतच सहभागी व्हायचे असते. मात्र, त्याचे दडपण घ्यायचे नसते हे आम्ही या स्पर्धेतून शिकलो. आमची फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीची सातत्यपूर्ण हो नव्हती. मग खेळाडूंनी चर्चा केली व यातून कसा मार्ग काढायचा यावर विचार केला. काही योजनाही तयार केल्या व त्यांची अचूक अंमलबजावणीही केली. यात आम्हाला यश मिळाले व आम्ही उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य लढतीत भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता आमच्यापासून विजेतेपद एकच पाऊल दूर आहे हेच लक्षात ठेवले व पाकिस्तान संघाला प्रत्येक धावेसाठी लढा द्यावा लागेल अशीच गोलंदाजी करण्याची योजना होती व ती यशस्वीही झाली, असे स्टोक्सने सांगितले.
आमच्या योजनेनुसार पाकिस्तानला दीडशतकी धावांच्या आतच रोखायचे ठरवले होते व तेच घडले. तीथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो. आता फलंदाजी करताना प्रमुख फलंदाजांना अपयश आल्यावर मी खेळपट्टीवर टिकून राहात जास्तीत जास्त सावध व कमी धोका पत्करून खेळलो. मला हॅरी ब्रुक्स व मोईन अली यांनी सुरेख साथ दिली. हा विजय कोणा एकट्याचा नव्हे तर संपूर्ण संघाचा आहे. आता येत्या काळात यशाचा आलेख असाच कायम राखण्यासाठी आम्ही क्षमतेपेक्षाही जास्त सातत्यपूर्ण व सरस खेळ करू, असा विश्वासही स्टोक्सने व्यक्त केला.
आम्हाला 20-25 धावा कमी पडल्या – बाबर
अंतिम सामन्यात फलंदाजी करताना प्रत्येकाने त्याचा नैसर्गिक खेळ करावा असे मी खेळाडूंना सांगितले होते. मात्र, त्यात आम्हाला यश आले नाही. इंग्लंडची फलंदाजीची क्षमता पाहता आम्हाला 20 ते 25 धावा कमी पडल्या. इतकेच नव्हे तर आमचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाल्याचाही फटका बसला. अर्थात ही कारणे देत मला इंग्लंडचे श्रेय हिरावून घ्यायचे नाही. त्यांनी सर्वच क्षेत्रात आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली व त्यामुळे त्यांनाच विजेतेपदाचा हक्क होता, असे मत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने व्यक्त केले आहे.