रायगड – करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षात विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झालेल्या नव्हत्या. चालू शैक्षणिक वर्षात करोनाचा संकट आटोक्यात आल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये आधी ऑनलाइन व नंतर प्रत्यक्ष सुरू झालेली आहेत. यामुळे परीक्षाही ऑफलाइनच घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता.
त्यानुसार वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून त्यानुसार परीक्षेला सुरुवात झालेली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजी हा होता. मात्र, या परीक्षेच्या पहिल्या दिवशी अभ्यास न झाल्याच्या भीतीने रायगडमधील एका विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील सानेगावमध्ये हा प्रकार घडला. प्रकाश बांगारे (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने शुक्रवारी गळफास घेतला. करोनामुळे गेल्या वर्षभरात शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. मात्र, त्यामुळे प्रकाशचा अभ्यास व्यवस्थित झाला नव्हता. त्यामुळे प्रकाश प्रचंड तणावात होता. अखेर या तणावापोटी प्रकाशने इंग्रीज विषयाच्या पेपरपूर्वी शाळेबाहेरच्या जंगलात गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.