मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाने संपूर्ण राज्यातला धक्का दिला होता. कारण अजित पवार यांनी अचानकपणे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नऊनेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या सगळ्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट पडले आहेत. त्यासोबतच अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर आपला दावा केला तसंच निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असल्याचे स्पष्ट केले. आता या सर्वात शरद पवारांचे ज्येष्ठ सहकारी चंद्रराव तावरे यांनी राज्यातील घडामोडीवर मोठा दावा केला आहे. त्यासोबतच हे सगळं नाटक शरद पवारांनीच घडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यातील घडामोडीवर बोलताना चंद्रराव तावरे यांनी,“मी ४० वर्षे शरद पवारांबरोबर राजकारणात होतो. मी निवडणुकीत त्यांचा प्रचारही केला आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे मला माहित आहे. त्यांच्यात कधीही फूट पडू शकत नाही. हे सगळे लोक एकच आहेत. हे सगळं दाखवण्यासाठी वरच्या लोकांना सांगण्यासाठी हे सगळं चाललं आहे. कारण त्यांच्यावर ज्या काही कारवाया होणार आहेत त्या टाळण्यासाठी हे पाऊल शरद पवारांनी उचललेलं असावं.” असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्याविषयी तावरे म्हणाले, “शरद पवार आत्ता जे करत आहेत त्याच्याही पुढे जाऊ शकतात. कारण कायद्याचा बडगा उगारला गेला तर कुटुंबाची वाताहात होणार आहे. अडचण टाळण्यासाठी शरद पवारांनी हे सगळं घडवलं आहे. अडीच वर्षांचं सरकार झालं, त्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते सरकार पाडायची काय आवश्यकता होती? पहाटेच्या शपथविधीला काय काय घडलं हे आपल्याला माहित आहे.” चंद्रराव तावरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
चंद्रराव तावरे यांच्याविषयी सांगायचे झाल्यास, चंद्रराव तावरे हे शरद पवारांचे जुने सहकारी आहेत. सध्या ते भाजपात आहेत मात्र त्यांनी शरद पवारांसह ४० वर्षे काम केले आहे. शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. विविध चौकशांमधून सुटण्यासाठी शरद पवारांनी हा कार्यक्रम केला आहे. असा दावा आता चंद्रराव तावरेंनी केला आहे.