पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश अथवा शंकाबाबत विद्यार्थ्यांनी दूरध्वनी केल्यास प्रतिसाद मिळत नाही. विशेषत: परीक्षा विभागासह अन्य विभागांत दूरध्वनी केल्यास तो उचलला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी विद्यापीठात यावे लागते. त्याचप्रमाणे विद्यापीठ विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नाही, असा अनुभव काही विद्यार्थ्यांनी मांडला आहे.
पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य असते. विद्यापीठ व महाविद्यालय प्रवेशासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी विद्यार्थी संबंधित विभागात दूरध्वनीवरून चौकशी करतात. मात्र दूरध्वनी उचललाच जात नाही. त्यामुळे नाशिक, नगरवरून केवळ प्रमाणपत्रासाठी विद्यापीठात यावे लागत लागते. हीच स्थिती सर्वच विभागात आहे. दूरध्वनी अथवा ई-मेलवरून विद्यार्थ्यांचे शंकाचे समाधान होऊ शकते. मात्र तशी विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही, अशी भावना पालक व्यक्त करीत आहेत.
प्रतिमा सुधारणा का?
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विद्यापीठाची जनमानसात प्रतिमा उंचावण्यास प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे. नॅक मूल्यांकनाच्या पब्लिक पर्सेप्शन गटात विद्यापीठाला सर्वांत कमी गुण आहेत. त्यामुळे नव्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सक्षम व्यवस्था उभी करावी, अशी अपेक्षा पालकांकडून कुलगुरूंकडे व्यक्त होत आहे.
मार्गदर्शन केंद्राची मागणी
विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, अभ्यासक्रमाबाबत माहिती देणे, प्रवेशाबाबतच्या अडचणी सोडवणे यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अशी मागणी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली आहे.