गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा
पुणे – देशातील 75 लाखांपर्यंतची उलाढाल असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून मुक्त करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, कॉंग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला. ही मर्यादा 40 लाखांपर्यंत आणण्याची मागणी केली. त्यामुळे छोट्या व्यापारी जीएसटीच्या मुक्त होऊ न शकल्याने कचाट्यात सापडले आहेत, असा आरोप केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी केला.
भाजप-सेना महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजश्री शिळीमकर, कविता वैरागे, बाळा ओसवाल, अजय भोसले, दीपक मिसाळ आदी उपस्थित होते.
देशात छोट्या व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना वर्षानुवर्षे सामोरे जावे लागत होते. अनेक वर्षांनी जीएसटी आल्याने त्यात बदल झाला. वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत खालच्या भागात होणारा भ्रष्टाचार संपणार नाही. पाच वर्षांत हाच विचार बदलण्याचे काम केले. कॉंग्रेसच्या विरोधामुळेच छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून मुक्त होता आले नाही. जीएसटीच्या बैठकीमध्ये वेगळे मत आणि बाहेर वेगळा देखावा असे कॉंग्रेसचे लोक करीत होते. त्यामुळे छोटे व्यापारी जीएसटीमध्ये अडकले, असा आरोप गोयल यांनी केला. सूत्रसंचालन प्रवीण चोरबेले यांनी केले.
व्यापारी चुकीच्या मार्गावर
व्यापारी मेळाव्यात विविध व्यापाऱ्यांनी व्यवसायात येणाऱ्या अडचणींचा पाढा पियूष गोयल यांच्यापुढे ऐकविला. त्यावेळी जीएसटीच्या कायद्यातील अनेक चुकांमुळे अनेक व्यापाऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्या अशा तक्रारी करण्यात आल्या. त्याचा संदर्भ देत गोयल यांनी व्यापाऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्याऐवजी त्यांनाच प्रत्युत्तराची भाषा केली. “व्यापाऱ्यांनी व्यवसायात शॉर्टकटच्या लालसेमुळे चुकीचा मार्ग स्वीकारला. कर चुकवेगिरी करणे व्यापाऱ्यांना कधीच अडचणीचे वाटले नाही. त्यामुळे त्यांना नोटीसा आल्या की चुकीचे वाटते. जीएसटीमध्ये आम्हीच बदल घडवून आणला,’ अशा शब्दांत गोयल यांनी व्यापाऱ्यांना उत्तर दिले