मुंबई – करोना आणि इतर कारणांमुळे पर्यटनावर अवलंबून असलेली श्रीलंका अस्ताव्यस्त झाली आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधन, वीज इत्यादीचे रेशनिंग चालू आहे. एवढेच नाही तर वह्या, पुस्तके नसल्यामुळे श्रीलंकेतील शाळा बंद आहेत, वर्तमानपत्राचा कागद नसल्यामुळे वर्तमानपत्राचे प्रकाशन बंद झाले आहे.क्रिसील या पतमानांकन संस्थेने श्रीलंकेबाबत जाहीर केलेल्या टिपणात म्हटले आहे की गेल्या पंधरवड्यात श्रीलंकेने 44 अब्ज डॉलरच्या परकीय कर्जाबाबत दिवाळखोरी जाहीर केली आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या रुपयाचे मूल्य वेगात कमी होऊन 325 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले आहे.
हा पेचप्रसंग निर्माण होण्यापूर्वी श्रीलंकेच्या 195 रुपयांना एक डॉलर मिळत होता. श्रीलंकेतून चहा व तयार कपड्याची निर्यात इतर देशांना केली जात होती. त्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या निर्यातीपैकी काही हिस्सा भारताला मिळू शकतो असे समजले जाते.अगोदर बरीच जहाजे इंधनासाठी आणि इतर कामासाठी श्रीलंकेतील बंदरावर थांबत होती. मात्र तेथे इंधनाची कमतरता असल्यामुळे यातील बरीच जहाजे भारताच्या बंदरावर थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फायदा भारताच्या दक्षिण आणि पूर्वेकडील बंदरांना होण्याची शक्यता आहे.
भारतावर परिणाम होणार नाही
सरलेल्या वर्षात भारताचा परकीय व्यापार तब्बल 1,000 अब्ज डॉलरचा झालेला आहे. यामध्ये श्रीलंकेसोबतच्या व्यापाराचे योगदान केवळ एक अब्ज डॉलर म्हणजे 0.64 टक्के आहे. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीत भारताच्या व्यापारावर फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही असे या संस्थेने जारी केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. भारत आणि श्रीलंका दरम्यान कॉफी, चहा, साखर, कापूस, अन्नधान्य, फळे, इत्यादीचा व्यापार केला जातो. मात्र या व्यापाराचे प्रमाण कमी असल्यामुळे भारताच्या आयातीवर किंवा निर्यातीवर श्रीलंकेतील घडामोडीचा जास्त परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.