नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. सध्याची परिस्थिती १९३२ पेक्षा गंभीर असल्याचे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी केले आहे. पुस्तक प्रकाशनादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.
एस.जयशंकर म्हणाले कि, १९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपले सैनिक शहीद झाले आहेत. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनाती केली आहे.
तसेच, चीनसोबत आपली लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण, चीनने एकतर्फी कुठलाही बदल न करता सर्व करार आणि सहमतीचा आदर केला तर सीमावादावर तोडगा निघू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, चीनबरोबर सीमेवर निर्माण झालेला तणाव संपुष्टात येण्यासाठी शांततामय मार्गाने तोडगा काढण्यावर भारत सरकारचा भर आहे. मात्र, चीनबरोबरची चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी पर्यायाचा विचार करण्याची भारताची तयारी आहे, अशी रोखठोक भूमिका संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांनी मांडली आहे.