कवठे – वाई तालुक्यातील आसले येथे मुंबईवरुन आलेल्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याने संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. तसेच संबंधित करोनाबाधित व्यक्तीची पत्नी, सून व नात यांना वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर संपर्कातील अन्य तेराजणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी, 18 मे रोजी मुंबई येथील एक व्यक्ती कुटुंबासह आपल्या मुळ गावी आसले येथे आली होती. त्यातील 67 वर्षांच्या पुरुषाला श्वसनाचा त्रास होत असल्याने 23 मे रोजी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गिते यांनी तपासणी केल्यानंतर संबंधिताला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी या व्यक्तीचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रविवार, 24 रोजी संबंधिताचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला. आसले येथील संबंधित व्यक्ती करोना बाधित असल्याचे समजाताच सोमवारी सकाळी वाई तालुका प्रशासनाने आसले गावात धाव घेत बाधिताच्या कुटुंबातील पत्नी, सून व नात यांना विलगीकरण कक्षात दाखल येथे. तसेच संपर्कातील अन्य 13 जणांना होम क्वारंटाइन केले आहे.
तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पोलीस अधिकारी श्याम बुवा यांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत काही सूचना केल्या. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावात सर्वत्र सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्याम बुवा, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप यादव, वैद्यकिय अधिकारी डॉ. गणेश गिते, डॉ. विजय ठोंबरे, डॉ. आशा निकम, आरोग्य सेविका वर्षा ससाणे, मंडल अधिकारी सचिन जाधव, तलाठी संकेत साळुंखे, ग्रामसेवक दीपक देशमुख आदीनी संपुर्ण आसले गाव सील बंद केले व उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
अफवार पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील आसले आणि देगाव या गावांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आसले, देगावसह परिसरातील इतर गावांमध्येही अनेकजण पुण्या, मुंबईवरुन आलेले आहे. यातील अनेकांना विलगीकरण कक्षातदेखील ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात ठेवले म्हणजे करोनाबाधित झाले असे होत नाही. त्यामुळे लोकांना विनाकारण सोशल माध्यमांद्वारे अफवा पसरवू नयेत, अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी सांगितले.
…तर सरपंच पद रद्द करू
काही गावांचे गाव कारभारी हे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करतात. तर काहीजण दक्षता कमिटीत असूनसुद्धा गांभिर्याने लक्ष देत नाहीत, अशा बेजाबदार सरपंचांना पदावरून काढून टाकले जाईल व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशारा देत वाईचे तहसीलदार रणजीत भोसले व गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी आसले ग्रामपंचायत सदस्यांना खडसावले.