भोपाळ – कॉंग्रेसने गेल्या 70 वर्षात काय केले हा प्रश्न पंतप्रधान मोदी सतत विचारत असतात, पण मोदी ज्या शाळेत शिकले ती शाळा कॉंग्रेसने बांधली होती, ते कॉलेजला गेले होते की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी मिळवलेल्या एन्टायर पॉलिटीकल सायन्सची पदवी ज्या संगणकावर छापली आहे.
ती पदवीही कॉंग्रेसनेच उपलब्ध केलेल्या संगणकांवर छापली गेली असावी अशा शब्दात कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना मोदींवर निशाणा साधला.
त्या म्हणाल्या की, आपले वडिल राजीव गांधी यांनी देशात संगणक आणण्यासाठी पुढाकार घेतला पण त्यांच्या संगणकीकरणालाही भाजपनेच विरोध केला होता असा दावाही त्यांनी केला.
त्या म्हणाल्या की, पंडित नेहरूंना देश पुढे नेण्याची अत्यंतिक इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्नही केले. त्यासाठीच त्यांनी देशात आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था उभ्या केल्या. एम्स सारखी मोठी रूग्णालये त्यांच्याच काळात उभारली गेली.
परंतु आज देशातील सर्व सरकारी कंपन्या आणि उद्योग मोदी सरकारने उद्योगपतींच्या हाती सोपवण्याचे काम केले आहे असा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की या सरकारी कंपन्या मोदींच्या उद्योगपती मित्रांना दिल्या गेल्या.
मोदींच्या राजवटीत देशातील सरकारी संस्थांचे खासगीकरण झाले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकांचे निवृत्तीवेतन बंद झाले अशी टीकाहीं त्यांनी केली.
मध्यप्रदेशातील निवडणुकीसाठी गव्हासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) 2,600 रुपये आणि धानासाठी 2,500 रुपये, शेती कर्जमाफी, 100 युनिटपर्यंत मोफत वीज आणि 200 युनिटपर्यंतच्या वापरासाठी अर्धा दर,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, पाचशे रूपयांत सिलिंडर आणि इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 27 टक्के आरक्षण ही कॉंग्रेसची काही आश्वासने आहेत ज्यांचा प्रियंकांनी यावेळी पुनरुच्चार केला.