Manoj Jarange Patil – सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घोषित झाला नाही तर मराठ्यांना हे आरक्षण न देण्यासाठी कोणत्या ओबीसी नेत्यांनी दबाव आणला आणि कोणत्या मराठा नेत्यांनी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही त्या नेत्यांची नावे आपण जाहीर करू असे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे यांनी पत्रकारांना सांगितले की, 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण दिले गेले नाही तर आम्ही या नेत्यांची नावे जाहीर करू. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिले जावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचे नेते व राज्यातील एक मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागच्या दारातून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना विरोध केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. हिंसाचार आणि दबावाचे डावपेच खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी म्हटले आहे की, गेल्या 30-40 वर्षांपासून सरकारवर ओबीसी नेत्यांचा दबाव होता, त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नव्हते. पण 24 डिसेंबर पर्यंत हे आरक्षण जाहीर केले नाही तर आम्हाला विरोध करणाऱ्या या नेत्यांची नावे जाहीर केली जातील. ज्या सुविधा ओबीसींना मिळतात त्या मराठा समाजालाही देण्यात याव्यात.
राजकीय लाभासह आज ओबीसी वर्गाला जे फायदे मिळतात ते सर्व आम्हाला मिळायला हवेत,” असे ते म्हणाले.राज्यात ओबीसींकडून मोर्चे काढले जात असले तरी गावागावातील लोकांना माहित आहे की आमच्याकडे पुरावे असतील तर आम्हाला (मराठा समाजाला)ही आरक्षण मिळाले पाहिजे.
आमच्याकडे पुरावा नसता तर त्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला असता. त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध का आहे हे ओबीसी नेत्यांनी स्पष्ट करावे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांनी आपले जीवन संपवले त्यांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, असे आवाहनही जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला केले आहे. त्यांना आर्थिक मदत तसेच सरकारी नोकऱ्या मिळाव्यात आणि याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा, असे त्यांनी सांगितले.