पुणे – शहराचा पश्चिम भाग वगळता शनिवारी पहाटेपासून अन्य भागांत दमदार पाऊस झाला. यामुळे पुणेकर सुखावले, असले, तरी यामुळे पालिकेच्या दर्जाहिन विकासकामांची झलक पुन्हा दिसून आली. हडपसर, नगररस्ता, स्वारगेट, येरवडा, कोंढवा, मगरपट्टा रस्ता, पुणे स्टेशन परिसर, जेधे चौक, लोहगाव, कोरेगाव पार्क परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. ते वाहून जाण्यासाठी स्वतंत्र सुविधा नसणे तसेच चुकीच्या पद्धतीने कामे केल्याचा परिणाम दिसून आला.
दरम्यान, शनिवारी सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांनी रस्त्यावरील पूरस्थितीबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविले. त्यानंतर पाण्याला वाट करून देण्यासाठी पालिकेनेही काम सुरू केले. गुंजन चौक, जेधे चौक, बिबवेवाडी रस्ता, लुल्लानगर परिसर तसेच सिंहगड रस्त्यावर अनेक भागांत दोन ते तीन तूट पाण्याची तळी साचली होती.
तक्रारींचा पाऊस…
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शनिवारी पहाटे पासूनच पाणी साचल्याच्या जवळपास वीसपेक्षा अधिक तक्रारी आल्या. त्यात प्रामुख्याने हडपसर, कोंढवा, स्वारगेट, पुणे स्टेशन, नगररस्ता, कोरेगाव पार्क, कोंढवा संविधान चौक, भाग्योदयनगर, कात्रज तलाव, आंबिल ओढ्याचा काही भाग, लुल्लानगर चौक, रविदर्शन चौक, मगरपट्टा रस्ता, लाल देऊन, गुंजन चौक, पुणे स्टेशन औद्योगिक भाग, लोहगाव, सातारा रस्ता, बिबवेवाडी, कात्रज, मध्यवर्ती भागातील अनेक पेठांमधील रस्ते, डीपी रस्ता या भागात रस्त्यांवर पाणी साचण्याच्या तक्रारी होत्या.
आपत्ती निवारणासाठी 300 कर्मचारी
हवामान विभागाने आधीच पावसाचा अंदाज वर्तविल्याने महापालिकेने तक्रारी येणाऱ्या भागात आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी नेमण्यात आलेली पथके पाठविली. दरवर्षी शहरात रस्त्यावर साठणारे पाणी तसेच दुर्घटना घडल्यास तातडीची बाब म्हणून प्रत्येकी 25 कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्रीही या पथकांसोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शनिवारी पहाटेपासूनच पाणी साचण्याच्या तक्रारी येत असल्याने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागरिकांची तक्रार प्राप्त होताच तातडीने पाण्याचा निचरा करण्यात आला आहे.
– गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
पुन्हा वाहतूक कोंडी…
शनिवारी-रविवारी बहुतांश शाळा, तसेच खासगी आणि शासकीय आस्थापनांना सुटी असते. त्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ कमी असते. मात्र, शनिवारी पहाटेपासूनच पावसाची सुरूवात झाल्याने सकाळी अनेक प्रमुख रस्त्यांवरील सिग्ल यंत्रणा बंद पडली होती. तसेच खड्डे, पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली होती. परिणामी, सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावल्याने शहरात अनेक भागात दुपारी पाऊस थांबेपर्यंत कोंडी कायम असल्याचे दिसून आले.