पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह मावळातील विविध गावांना पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण 100 टक्के भरलेले आहे. तर शनिवारी (दि.2) पहाटे संपूर्ण मावळासह पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वीज निर्मिती गृहाव्दारे पवना नदीमध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी साडेनऊ वाजता 800 तर दुपारी यामध्ये वाढ करून 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदी काठच्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
यंदा पावसाळ्याला जूनच्या अखेर सुरूवात झाली. पावसाने जूलैमध्ये चांगलीच बॅटिंग केल्याने पवना धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. मात्र, पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी पवना धरण 100 टक्के भरत असते. मात्र, पावसाने पुन्हा ओढ दिली. अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे पवना धरण 22 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले. त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. मात्र, शनिवारी पहाटे पावसाने पुन्हा हजेरी लावली.
यामुळे विज निर्मिती गृहाव्दारे पवनानदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी 800 तर दुपारी यामध्ये वाढ करून 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदी काठच्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
पवना नदी काठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीमधील पाण्याचे पंप, शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या.