दहिवडी – जालन्यात मराठा बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपोषणास बसले असताना, पोलीस कर्मचारी व उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर लाठीमार केला. यामध्ये उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.
मराठा समाजाने आपल्या हक्कासाठी खूप मोठी लढाई केली आहे. जवळजवळ 60 मोर्चे लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने काढले तरीही त्यांनी शांतता कायम राखली, हे अभिनंदनीय असून, मराठा समाजाच्या पाठिशी कायम आहे, असे उद्गार आ. जयकुमार गोरे यांनी काढले.
दुर्दैवाने जालन्यात घडलेली घटना पोलिसांनी संयमाने हाताळायला पाहिजे होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेचा निषेध केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व माहिती घेतली असुन, घटनेत दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्या घटनेसंदर्भात शासन स्तरावरून संबंधित लोकांवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे, असेही श्री. गोरे म्हणाले.