आ. पृथ्वीराज चव्हाण; कराड येथे विजय संकल्प सभेत टोला
कराड – विरोधक म्हणतात पृथ्वीराजबाबांनी कोणती विकासकामे केली? हे चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर मी समजून घेऊ शकतो. कारण, विरोधकांना मी केलेली कामे माहीत असली तरी ते मान्य करायला तयार नाहीत; परंतु केलेली विकासकामे जनतेला माहीत आहेत, असा टोला आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. अतुल भोसले यांचे नाव न घेता लगावला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगरपालिकेच्या चौकामध्ये सायंकाळी झालेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीनिवास पाटील, कराड उत्तरचे उमेदवार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, शिवराज मोरे, नंदकुमार बटाणे, बंडानाना जगताप, राजेंद्र यादव, झाकीर पठाण, मानसिंगराव जगदाळे, राजाभाऊ पाटील, अजित पाटील-चिखलीकर व पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला नागरिकांनी गर्दी केली होती.
आ. चव्हाण म्हणाले, विरोधी पक्ष संपुष्टात आणायचे भाजपचे स्वप्न आहे. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरून, यातील ज्याला जी मात्रा लागू आहे, त्याला ती लागू करून आपल्या पक्षात घ्यायचे, अशा पद्धतीने भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. इडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. आम्ही सत्तेत होतो तरी सत्तेचा असा गैरवापर कधीही केला नाही. या हुकूमशाही सरकारने लोकशाहीतील संस्था काबीज केल्या आहेत. त्यामुळेच तीन महिन्यांच्या आत लोकसभेची पोटनिवडणूक पुन्हा जाहीर झाली. ही निवडणूक भावनिक मुद्द्यांच्या आधारे भाजप लढत आहे. मात्र, राज्यावर बेरोजगारी, मंदी अशी संकटे आहेत. म्हणूनच या सरकारला रोखण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे आम्ही दोन भाऊ ताकदीने विरोध करत आहोत. आता सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक तीन महिन्यांपूर्वी झाली. मतदारांची बोटांवर लावलेली शाई अजूनही पुसली गेलेली नाही. प्रचाराला गेल्यावर लोक मला बोटे दाखवून म्हणत आहेत की, साहेब आमच्या बोटांवरील शाई अजून तशीच आहे आणि त्यांनी लगेच राजीनामा दिला. राजीनामा देण्याची एवढी घाई उदयनराजेंना का झाली होती, हे समजत नाही. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, भाजपने पाच वर्षात सर्वसामान्य जनतेला काय दिले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जनतेला भुलवून हे लोक सत्तेवर आले. मात्र ती आश्वासने पूर्ण करता न आल्याने नोटबंदी, जीएसटी आणून या सरकारने उद्योगधंदे बंद पाडले आहेत. आघाडीला आता चांगले दिवस येणार आहेत. दरम्यान, गोटेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कार्यकर्ते अनिल जाधव यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.