कापूरहोळ, (वार्ताहर) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार केंजळ (ता. भोर) येथील गट नंबर 682 मधील 80 आर क्षेत्र विद्युत वितरण कंपनीला हस्तांतरीत केले जाणार आहे. या बाबत सचिवालयातून तशे आदेशजिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.
यामुळे महावितरणला केंजळ येथे 33/11 केव्ही क्षमतेचे वीजउपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महावितरणचे उपकेंद्रासाठी शेतकर्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिली.
राज्याच्या महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभागाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी पुणे विभागाच्या आयुक्तांना केंजळ (ता. भोर) येथील गट नंबर 682 मधील 80 आर क्षेत्र विद्युत वितरण कंपनीला हस्तांतरीत करण्यासाठी सूचित केले आहे. यामुळे भोर तालुक्याच्या पूर्वेकडील 18 गावांमधील बागायती क्षेत्राला उच्च दाबाने वीज पुरवठा होणार आहे.
गेली अनेक वर्षांपासून केंजळमध्ये महावितरणचे उपकेंद्र उभारण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न सुरू होते; परंतु त्रुटींची पूर्तता करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पुणे-सातारा महामार्गावर किकवी येथे शेतकर्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर या संदर्भात अजित पवार यांनी 21 फेब्रुवारी रोजी या विभागाच्या प्रधानसचिवांना त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित जमीन मराहाष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांना देण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश उपसचिवांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यामुळे भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांचा विजेचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.