टिळेकरनगर येथील सेंटरबाबत नागरिकांची तक्रार
कोंढवा – कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर भागातील सिंहगड हॉस्टेलमधील सुमारे 50 ते 55 नागरिकांना करोनामुळे विलगीकरण (क्वारंटाइन) करण्यात आले असले तरी येथील असुविधांमुळे हे क्वारंटाइन सेंटर आहे की कारागृह, असा सवाल करोना संशयितांकडून केला जात आहे.
टिळेकरनगर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधा मिळत नसल्याचे समजल्यानंतर वंदेमातरम् संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत नरवडे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यामध्ये नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, असे दिसून आले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
येथील संशयितांना औषधेही वेळेत दिली जात नाहीत. डॉक्टर अथवा नर्स वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तीन दिवसांपासून पाणी येत नाही. स्वच्छता नाही, लहान मुलांना बिस्कीट, दूध, गरम पाणी मिळत नाही. झोपण्यासाठी गादी आहे. पण, पांघरुण नाही. यातून रुग्णांचे हाल होत आहेत.
यावेळी वंदेमातरम् संघटना शहराध्यक्ष प्रशांत नरवडे, उपाध्यक्ष सूरज जाधव, हेमंत कुंभार आशिष मुल्या, विनोद मुल्या व दिगंबर बोत्रे आदी उपस्थित होते.