कुदळवाडीवासियांची व्यथा ः उपचारासाठी होतेय ससेहोलपट
चिखली – भंगारमालाच्या वारंवार गोदामांना आग लागण्याच्या घटनांमुळे कुदळवाडीवासियांचा जीव धोक्यात आहे. मात्र, या परिसरात महापालिकेचे साधे प्राथमिक आरोग्य केंद्र देखील नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
कुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे, लघु उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी हजारो कामगार काम करतात. तसेच बालघरेवस्ती, यादवनगर, पवारवस्ती, सेक्टर 16, भैरवनाथनगर, महादेव मंदिर परिसर वस्ती आदी भागामध्ये सुमारे 30 हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. या भागातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मात्र, महापालिकेच्या सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. भंगार मालाच्या गोदामांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने चिखली परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र देखील उभारले आहे. परंतु, येथील नागरिकांच्या आरोग्य सुविधेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात जवळपास महापालिकेचे एकही रुग्णालय नसल्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांची गैरसोय होते. सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेचे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) अथवा भोसरी येथील रुग्णालयात गाठावे लागते.
वेळ व खर्चिकदृष्ट्या हे परवडणारे नाही, या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र देखील नाही. त्यामुळे खासगी दवाखाने, रुग्णालयांकडून सामान्यांची लूट होत असल्याची तक्रार नागरीक करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षण तसेच जागा नसल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, या भागातील वाढती लोकसंख्या तसेच दुर्घटनांचे प्रमाण पाहता रुग्णालय उभारणीबाबत विचार करावा. प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी कुदळवाडीवासियांकडून होत आहे.
कुदळवाडीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिक परिसर असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारवस्ती याठिकाणी वास्तव्यास आहे. लहान मुले, महिला यांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. महापालिकेच्या आरोग्य सेवा व सुविधा यांना मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. महापालिकेने दखल घेऊन कुदळवाडीतील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर उभारावे.
दिनेश यादव, स्वीकृत सदस्य, महापालिका.