दत्तात्रय पवार
कुडाळ – जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर आमदार शिंदे विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असा संघर्ष जावळी तालुक्यात सुरू झाला. नंतर तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांमधील निवडणुकात आमदार भोसले यांनी आपली ताकद दाखवून दिली. तर आता झालेल्या 15 ग्रामपंचायतींपैकी 14 ग्रामपंचायती निवडणुकीत थेट सरपंच पदासह सर्व ग्रामपंचायती ताब्यात घेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांची तालुक्यात नुसतीच लुडबुड दिसली. सत्ता मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या ताब्यातच राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे व दीपक पवार यांना तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गट बांधावा लागणार अशी परिस्थिती आहे. तसे झआले तरच तालुक्यात घड्याळाची टिकटिक ऐकू येईल.
तालुक्यातील केळघर ग्रामपंचायतीची यापूर्वीच बिनविरोध निवडणूक पार पडली होती. या ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचेच वर्चस्व राहिले तर उर्वरित पंधरा ग्रामपंचायतींपैकी मोरघर, कुसुंबी, ओझरे, सोमर्डी, वालुथ, भोगवली अशा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. थेट सरपंच निवड प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी चुरस होती.
कुसुंबी येथे शशिकांत शिंदे गटाचे साधू चिकणे व शिवेंद्रसिंहराजे गटाचे मारुती चिकणे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. मात्र, दोघांनाही समान मते मिळाली. चिट्ठीतून मारुती चिकणे यांची निवड झाली. मोरघर ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकांत शिंदे व दीपक पवार गट एकत्र येऊन येथील निवडणूक चुरशीची झाली. अखेर माथाडी कामगार नेते सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने राष्ट्रवादीची प्रतिष्ठा जपली.
ओझरे येथे माजी उपसरपंच अजित मर्ढेकर आता थेट सरपंच झाले आहेत. माजी आमदार सदाशिव सपकाळ, दीपक पवार या मातब्बरांच्या स्थानिक गटाला टक्कर देत ओझरे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात त्यांनी यश मिळवले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख असून प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांच्या पॅनलेला त्यांनी कडवी झुंज देत ग्रामपंचायत ताब्यात ठेवली. वालुथमध्ये सरपंचपदी मनीषा कमलाकर भोसले निवडून आल्या.
एकमेव भोगवली तर्फ कुडाळ ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेनेच्या ताब्यात आली. निवडणुकीचा कौल पाहता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची तालुक्यावर मजबूत पकड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात आता या घड्याळाला चावी द्यावी लागणार आहे. शशिकांत शिंदे तालुक्यात लक्ष घालत असूनही त्यांना मतदार तितकी ताकद देताना दिसत नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकांचे पडसाद जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर उमटलेले पहायला मिळतील हे मात्र निश्चित.
राष्ट्रवादीच्या आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह नेते दीपक पवार, अमित कदम,यांना आगामी काळात सक्षमपणे पक्ष बांधणी करावी लागणार हेच या निकालातून स्पष्ट होत आहे. याउलट आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढता जनसंपर्क व विकासकामांचा पाठपुरावा यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यांच्या साथीला वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे अशी नेतेमंडळी सक्रिय आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार शोधावे लागणार आहेत.
सुहास गिरी अलिप्त
तालुक्यातील सोसायटी निवडणुकांपासून ते ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत माजी सभापती सुहास गिरी दाम्पत्य कुठेही दिसले नाहीत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वरदहस्ताने सभापतिपदे मिळवूनही त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबतच राहणे पसंत केल्याने त्यांची तालुक्यातील राजकारणातील प्रभाव कमी झाला आहे. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानेच ते सावध पवित्रा घेत आहेत.